Thursday, August 4, 2016

अवयवदान

देहाचा प्रवास अंतिमत: राखेकडे जातो असं चिंतन अनेक वर्ष झालं आपण ऐकतोय, मानतोय. 'माती असशी मातीस मिळशी' ह्या भावनेने देहाचं अंतिम सत्य राख हे आपल्या विचारात पुरेपुर भिनलंय. देहाच्या भौतिक सुखासाठी आत्म्याशी तडजोड करू नये, हा विचार उदात्त जरी असला तरी बदलत्या काळात देहातून श्वास निघून गेल्यावर देहाची माती व्हावी, हे चिंतन चिंता वाढवणार आहे. दहन किंवा दफन करून मृत शरीराची माती करण्याऐवजी अवयवदानाने अनेक अभागी जीवनात नवा श्वास फुंकण्याची आज सोय झालेली आहे. लोक प्रबोधन वेग घेतयं. मग अजूनही 'देहाचा प्रवास राखेकडे' ह्या चिंतनाऐवजी एका देहाचा प्रवास दुसर्या देहाकडे असं नवं चिंतन का होऊ नये?

देहाची राख होत होती, होत आहे परंतु देहाचा राखेच्या दिशेचा प्रवास आता थांबायला हवा. देह मातीमोल होतो, शेवटी राख होते, हे असत्य आहे. देहातून प्राण निघून गेल्यावरही अचेतन देह अनेकांत प्राण फुंकू शकतो, हेच शाश्वत सत्य आहे.

सचिन मेंडिस